अंबादास करकरे लातूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकाऱ्यांकडून होत असलेला मनमानी कारभार आणि सर्वसामान्य वाहतूकदारांची होत असलेली आर्थिक लूट या विरोधात वारंवार निवेदने देऊनही कसलीच कारवाई होत नसल्याने लातूर जिल्हा युवा मोटार मालक चालक संघ आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी, लातूर यांच्या वतीने कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.
गेल्या ७ महिन्यापासून कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत संघटनेच्या वतीने निवेदने देण्यात आली मात्र प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी याची कसलीही दखल घेतली नाही असा गंभीर आरोप करीत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
बेमुदत साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून १५ सप्टेंबर २०२५ रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा उपोषण कर्त्यांनी घेतला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण रजेवर असल्याने आंदोलनकर्त्यांचे निवेदन प्र. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी स्वीकारले. या साखळी उपोषण आंदोलनात जितेंद्र भावे, ॲड. सैफ कोतवाल, संदीप पाटील, इनायत सय्यद, विलास लंगर, सचिन मोटे, वेदप्रकाश भुसनुरे, माधव सूर्यवंशी, अमोल शिंदे, ॲड. सचिन बोरगावकर, सोमनाथ मेदगे यांचा सहभाग आहे.

Post a Comment
0 Comments