Type Here to Get Search Results !

**दहा रुपयांच्या सिगारेटसाठी बार चालकाचा निर्घृण खून अवघ्या पाच तासांत तिन्ही आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व चाकूर पोलिसांची संयुक्त कारवाई**


लातूर /अंबादास करकरे 

दहा रुपयांच्या सिगारेटच्या पैशावरून झालेल्या किरकोळ वादातून एका बार चालकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नायगाव येथे घडली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व चाकूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या पाच तासांत तिन्ही आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.

नायगाव येथील बी. एन. बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटचे मालक गजानन नामदेव कासले (वय ४२, रा. नायगाव, ता. चाकूर) यांचा शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला. गजानन कासले हे बारमध्ये असताना तीन आरोपींनी संगनमत करून जबरदस्तीने बारमध्ये प्रवेश केला. दारू व सिगारेट देण्याच्या कारणावरून त्यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान आरोपींनी सिगारेटचे पैसे ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला. मात्र नेटवर्क नसल्याने पैसे खात्यात जमा झाले नाहीत. यावेळी बार चालक गजानन कासले यांनी “सिगारेटचे पैसे दिल्याशिवाय बाहेर जाऊ देणार नाही,” असा ठाम पवित्रा घेतला. या कारणावरून चिडलेल्या तिन्ही आरोपींनी लाकडी काठ्या व दांडक्यांनी गजानन कासले यांच्या डोक्यावर व शरीरावर जबर मारहाण केली. डोक्यात जोरदार मार लागल्याने गजानन कासले हे जागीच कोसळले व त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेत बारमध्ये काम करणारा वेटर अजय भरत मोरे (वय २८, रा. अजनी, ता. अहमदपूर) यालाही काठीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. तसेच आरोपींनी बारमधील टीव्हीचे नुकसान करून कॅश काउंटरमधील अंदाजे १० ते १५ हजार रुपये रोख रक्कम व विदेशी दारूच्या बाटल्यांची चोरी केली. खून झाल्याचे लक्षात येताच तिन्ही आरोपी मोटारसायकलवरून फरार झाले.

या प्रकरणी मयताचा भाऊ बालाजी नामदेव कासले (वय ३७, व्यवसाय – शेती) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व पुरावे गोळा केले. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौघर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व चाकूर पोलिसांची संयुक्त पथके तयार करण्यात आली.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी हे माळाकोळी तालुक्यातील एका खेड्याजवळील जंगलात लपून बसल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या पाच तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी :मारुती ऊर्फ बबलू हरिबा बोयणे, संतोष राम तेलंगे, सागर हणमंत बोयणे (सर्व रा. धवेली, ता. रेणापूर) ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस ठाणे चाकूरचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोउपनि राजेश घाडगे, पोलीस अंमलदार संजय कांबळे, विनोद चलवाड, सूर्यकांत कलमे, माधव बिलापट्टे, प्रशांत स्वामी, राजेश कंचे, पाराजी पुठेवाड, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे, श्रीनिवास जांबळे तसेच चाकूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज निळकंठे, मंगेश चव्हाण, दामोदर सिरसाठ व शौकत बेग यांचा सहभाग होता.

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लातूर पोलिसांच्या या जलद, समन्वयपूर्ण व प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments