लातूर / अंबादास करकरे
लोकशाही ही आपल्या देशाची मूलभूत शक्ती असून निवडणूक ही त्या लोकशाहीची सर्वात पवित्र प्रक्रिया आहे. प्रत्येक नागरिकाला निर्भय, सुरक्षित आणि शांत वातावरणात मतदान करता यावे, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा ठाम संदेश लातूर पोलिसांनी दिला आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम तसेच रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. दुपारी 13.05 वाजता, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे (लातूर शहर) यांच्या नेतृत्वाखाली ही रंगीत तालीम यशस्वीपणे पार पडली.
या तालीममध्ये गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी व विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, 10 दुय्यम अधिकारी, 53 पोलीस अंमलदार तसेच 1 आरसीपी प्लाटून सहभागी झाले होते. संभाव्य दंगलसदृश परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी, जमाव कसा नियंत्रित करावा, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कायदेशीर मार्गाने परिस्थिती कशी हाताळावी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय कसा साधावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यादरम्यान सादर करण्यात आले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे या सरावातून अधोरेखित झाले.
रंगीत तालीमनंतर दुपारी 14.20 ते 14.45 या वेळेत गंजगोलाई ते सुभाष चौक, अंबिका मंदिर, पोस्ट ऑफिस मार्गे गांधी चौक पोलीस स्टेशन असा रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च केवळ पोलिसांच्या तयारीचे प्रदर्शन नसून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारा ठोस संदेश होता. “पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत” हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या रूट मार्चमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेबाबत जनजागृती झाली असून समाजकंटक, अफवा पसरविणारे व कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, हिंसाचार किंवा कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. दरम्यान, लातूर पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, निवडणुकीदरम्यान शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोखा राखावा. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासनास माहिती द्यावी.
ही रंगीत तालीम व रूट मार्च म्हणजे केवळ एक सराव नसून, लोकशाही मूल्यांप्रती पोलीस प्रशासनाची कटिबद्धता दर्शविणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. “सुरक्षित निवडणूक, शांत समाज आणि सशक्त लोकशाही” या उद्दिष्टासाठी लातूर पोलीस दल अविरतपणे कार्यरत असून नागरिकांच्या सहकार्यानेच ही प्रक्रिया अधिक प्रभावी व यशस्वी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




Post a Comment
0 Comments